ठाणे मनपा निवडणुकीत आदिवासीच्या बोगस जात प्रमाणपत्राद्वारे बिनविरोध महिलेवर कारवाई करा : राष्ट्रीय आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांची विभागीय आयुक्ताकडे मागणी

ठाणे मनपा निवडणुकीत आदिवासीच्या बोगस जात प्रमाणपत्राद्वारे बिनविरोध महिलेवर कारवाई करा : शिरपूर प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने निलंबित करा : राष्ट्रीय आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांची विभागीय आयुक्ताकडे मागणी 



नाशिक - 📍ठाणे मनपा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्र. ५ वर बिनविरोध झालेल्या सुलेखा शिवाजी सूर्यवंशी चव्हाण या उमेदवार बोगस आदिवासी आहेत. त्यांनी खऱ्या आदिवासींचा नामसाधर्म्याचा फायदा घेऊन धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र काढले. यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय झाल्याने राष्ट्रीय पातळीवरील आदिवासी युवानेते लकीभाऊ जाधव याविरोधात आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचेकडे तक्रार केली आहे. शिरपूर येथे अनुसूचित कोळी मल्हार जमातीचे खोटे जात प्रमाणपत्र देणारे शिरपूरचे प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांना तात्काळ निलंबित करावे. संबंधित महिलेवर फौजदारी कारवाई करावी. त्यांच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक मागणी यावेळी त्यांनी केली. लकीभाऊ जाधव यांनी म्हटले आहे की, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 


महाराष्ट्राच्या ४५ आदिवासी जमाती आहेत. यातील प्रत्येक जमातीचे अनुसूचित क्षेत्र ठरवून दिले आहे. यामधील ३० क्रमांकाची कोळी मल्हार जमात फक्त ठाणे, पालघर जिल्ह्यात आढळते. धुळे जिल्ह्यात ही जमात आढळत नाही. संविधानाने ठरवून दिलेल्या धुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात पावरा, भिल्ल, पारधी, कोकणी या जमाती आहेत. परंतु कोळी मल्हार जमात या अनुसूचित क्षेत्रात मोडत नाही. शिरपूरचे प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांनी मोठी आर्थिक देवाण घेवाण करून ठाणे मनपा प्रभाग क्र. ५ निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा शिवाजी सूर्यवंशी या बोगस आदिवासी महिलेला मदत केली आहे. या महिलेला नामसाधर्म्याचा फायदा घेऊन कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र २९ डिसेंबरला देण्यात आले. अवैध मार्गाने काढलेले ते जात प्रमाणपत्र तात्काळ जप्त करण्यात यावे. शिरपूर येथील प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांनी पदाचा दुरुपयोग करून खऱ्या आदिवासींचा दाखला बेकायदेशीरपणे दिल्याबद्दल त्यांना निलंबित करावे. संबंधित महिलेवर फौजदारी कारवाई करावी. त्यांच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून खऱ्या आदिवासींना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


बोगस हटाव,आदिवासी बचाव ।

Post a Comment

0 Comments